अनेक महत्वाच्या राज्यांना जोडणारा एक परिपूर्ण महामार्ग म्हणून लवकरचं पुणे-अहिल्यानगर महामार्गाची ओळख निर्माण होणार आहे अशी घोषणा खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी केल्याने संपूर्ण देशाचे लक्ष आता पुणे-अहिल्यानगर महामार्गावर केंद्रीत झाले आहे. काही वर्षातच हा भाग अनेक महत्वाच्या महामार्गांना गतीने जोडला जाणार असल्याने गडकरी यांनीही पुणे-अहिल्यानगर या महामार्गाची विशेष दखल घेतली आहे. त्यामुळे साहजिकचं या भागातील विविध उद्योग, व्यवसाय व दळण-वळण अधिक गतीमान होण्यासाठी भविष्यात मोठी संधी उपलब्ध होणार आहे एवढे मात्र निश्चित !
वास्तविक पाहता पुणे-अहिल्यानगर हा महामार्ग सध्या पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि खांदेश या भागाला जोडणारा एक महत्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र अलिकडच्या काळात गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू यासह दिल्लीला जोडणारा एक मध्यवत महामार्ग म्हणूनही आता पुणे-अहिल्यानगर महामार्गाची ओळख निर्माण होणार आहे. पुणे-अहिल्यानगर या महामार्गावर सध्या येरवडा, कल्याणीनगर आयटी पार्क, वाघोली सारखी डेव्हलप सिटी, कोरेगांव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगांव आणि सुपा झपाट्याने विकसीत होत असलेला हा औद्योगिक परिसर असल्याने या भागातून नोकरी-व्यवसायाच्या मोठ्या संधी बेरोजगार तरुणांना उपलब्ध होत आहेत, त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून या भागात नागरीक नोकरीसाठी स्थलांतरीत होत आहेत, यामुळे या भागातील उद्योग, व्यवसायाला मोठी गतीमानता लाभल्याचे चित्र सर्वच भागातून अनुभवायला मिळत आहे.
स्थानिक उद्योग व्यवसायीकांनाही विविध भागातील कंपन्यांची मोठ-मोठी कंत्राटेही उपलब्ध झाल्याने इथे काही तरुण कोट्यधीश झाल्याचीही उदाहरणे आहेत. सध्याही ही स्थिती कायम असताना आता पुणे-अहिल्यानगर महामार्गावर नव्याने उभा रहात असलेला अघिक गतीशील पुणे-औरंगाबाद महामार्ग, पुणे-अहिल्यानगर नवा रेल्वेमार्ग, शिरुर वरुन थेट भीमाशंकरकडे जाणारा नवा महामार्ग, अहिल्यानगर वरुन थेट शिरुरमार्गे मुंबईला जोडणारा नवीन समृध्दी हायवे, शिरुर जवळ असणाऱ्या चव्हाणवाडी वरुन थेट सातारला जोडला जाणारा नवीन महामार्ग असे विविध मार्ग आता या पुणे-अहिल्यानगर महामार्गाशी जोडले जाणार असल्याने या महामार्गाला आता अधिक गतीशीलता प्राप्त होणार आहे, किंबहुना हा महामार्ग आता राष्ट्रीय स्तरावर देखील प्रभावी ठरणार आहे.
विविध राज्यांना जोडणारा एक नवा महामार्ग म्हणूनही याकडे पाहीले जाणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष आता या नव्या महामार्गाकडे लागले आहे. यामुळे पुणे-अहिल्यानगर भागात आणखी मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे, धुळे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि गुजरात सारख्या शहरांचे अंतर इथून कमी होणार असल्याने इथून व्यापार, व्यवसायालाही मोठी उभारी मिळणार आहे.
त्यामुळे साहजिकच या भागातील तरुण उद्योजक, व्यावसायीक यांच्या दृष्टीनेही नवी भरारी घेण्यासाठी हा नवा महामार्ग या भागासाठी वरदान ठरणार आहे. पुणे-अहिल्यानगर नव्या रेल्वे मार्गामुळे पुणे आणि शिरुरचे अंतर तर अगदीच कमी होणार आहे, त्यामुळे साहजिकच स्थानिक उद्योग, व्यवसाय, नोकरदार यांना देखील सातत्याने मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे नव उद्योजकांनीही याचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा एवढे मात्र निश्चित !








